
महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहे अशीच एक घटना औरंगाबाद येथे उघडकीस आली असून परिसरातील भाईगिरीचे वर्चस्व आणि जुन्या वादातून प्लॉटिंगचा व्यवसाय करणाऱ्या एका 25 वर्षीय युवकाचा शनिवारी मध्यरात्री चाकूने तब्बल 36 वार करत खून करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर घटना मिरासवाडी गल्ली नंबर 9 मध्ये घडलेली असून हसन साजिद पटेल ( वय 25 राहणार मिरास वाडी ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सदर प्रकरणात रविवारी दिवसभरात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मयत व्यक्तीचा भाऊ जावेद पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हसन हा मित्राच्या वाढदिवसासाठी बुलेट घेऊन घराबाहेर पडला होता त्यानंतर कुटुंबीय हसनच्या मोबाईलवर सातत्याने संपर्क साधत होते मात्र त्याचा मोबाइल बंद येत असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी रिक्षाचालक असलेला भाऊ जावेद हा घराबाहेर पडला होता . रात्री अकराच्या सुमारास ग्रीव्हज कंपनी जवळील एका टपरीवर सिगारेट ओढत असताना नऊ जणांचे टोळके आले आणि त्यांनी हसनला घेरले त्यानंतर त्याला मारहाण करून त्याच्यावर वार करण्यात आले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.