
कोरोना संकटानंतर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी उन्हाळ्यात सुरू होणारा पाणपोई हा प्रकार बंद झालेला पाहायला मिळत आहे. कोरोना संकटात आणखीन प्रादुर्भाव होऊ नये या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे मात्र यामुळे भरउन्हात तहानलेल्या नागरिकांना बाटलीबंद पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे अर्थात सर्वच नागरिकांची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसते त्यामुळे नंदुरबार जिल्हा पोलिस दलाकडून नागरिकांच्या सोयीसाठी ठिकाणी सार्वजनिक पाणपोई सुरू करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढलेली आहे. जिल्ह्यातुन मजुरीसाठी जाणारे मजूर आणि लग्नसराईसाठी शहरात येणारे प्रवासी, सामान्य नागरिक यांच्यासाठी पाणपोई सुरू करण्याची संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी मांडली होती. पोलीस दलाच्या जिल्हा मासिक गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी यांना त्यांनी याबाबत सूचना केल्या होत्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनांची दखल घेत नंदुरबार शहर पोलिस ठाणे हद्दीत चार ठिकाणी तर तालुका स्तरावरील पोलीस ठाण्यांच्या ठिकाणी देखील अशा तीस पाणपोई जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या असून पोलीस दादांच्या या प्रयोगामुळे नागरिक देखील त्यांचे आभार व्यक्त करत आहेत.