
महाराष्ट्रात एक हृदयद्रावक घटना उघडकीला आली असून घरी परतण्याच्या ओढीने गाडी चालवत असताना अचानक रस्त्यात गाडी बंद पडली आणि दुर्दैवाने त्याच वेळी मागून आलेल्या एका कंपनीच्या बसने एका तरुणावर घाला घातला. सदर प्रकारात या तरुणाचा मृत्यू झाला असून रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चिपळूण शहरातील मार्कंडी येथे गुरुवारी झालेल्या या अपघातात सुरज मोरे ( वय 25 ) या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. चिपळूण तालुक्यातील वैजी येथील रहिवासी असलेला सुरज हा शहरातील एका दुकानांमध्ये काम करत होता. काम आटोपून घरी जाण्यासाठी तो चाललेला असतानाच मार्कंडी येथे त्याची दुचाकी अचानक रस्त्यात बंद पडली आणि पाठीमागून येणाऱ्या एका कंपनीच्या बसने त्याला धडक दिली त्यामुळे सुरज हा मागील चाकाखाली अडकला आणि त्याचा मृत्यू झाला.
सदर प्रकारानंतर तिथे मोठी गर्दी जमा झाली आणि त्याचा मृतदेह रात्री कामथे रुग्णालयात नेण्यात आला. सुरज हा मेकॅनिकल इंजिनीअर होता आणि गेली काही वर्ष एसी कुलर आणि फ्रिज रिपेरिंग याची सुविधा देत होता. सुरज यांच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार असल्याचे समजते.