
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना कोल्हापूर इथे उघडकीस आली आहे .कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केली अन त्यावेळी परिसरातील जागरूक नागरिक चक्क मोबाईलमध्ये सदर प्रकाराचा व्हिडीओ काढत होते. संवेदना गमावलेल्या या व्यक्तींच्या अशा प्रकारावर टीका होत असून त्यातील एक दोन जण जरी पुढे आले असते तरी या महिलेचा जीव वाचवण्यात आला असता .
25 जानेवारी रोजी ही घटना घडलेली असून आरोपी इम्तियाज नदाफ याने आपली पत्नी समिना हिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करुन आरोपी इम्तियाज याने घटनास्थळावरुन पळ काढला होता मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी समिना गंभीर जखमी झाली होती मात्र दुर्दैवाने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा अखेर मृत्यू झाला. आरोपी इम्तियाज हा समिनाच्या माहेरी गेला होता त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि इम्तियाजने तिच्यावर हल्ला केला. समिना आपले प्राण वाचवण्यासाठी पळू लागली आणि शेजारील दुकानात शिरली मात्र खुनाचे भूत अंगात शिरलेल्या इम्तियाजने तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तेथून पळ काढला.
पीडित समिना मदतीसाठी आरडाओरड करत होती पण कुणीही तिच्या मदतीसाठी धावून आलं नाही उलट तिचा पती धारदार शस्त्राने वार करत असताना नागरिक मोबाइलमध्ये शूट करत होते. जर वेळीच तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी समिनाच्या मदतीसाठी धाव घेतली असती तर आज कदाचित समिना जिवंत असती. या घटनेमुळे आता माणसातली माणुसकी मेली आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून माणुसकीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर इथे ही घटना घडलेली आहे.