
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत भारत जोडो यात्रेने एक हजार किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे पत्रकार परिषद घेऊन अनेकदा आपली भूमिका मांडत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत अनेक नागरिक सहभागी होत असून सर्वसामान्य नागरिकांना देखील राहुल गांधी तितक्याच आदराने वागवत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर दुसरीकडे राहुल गांधी यांचे कपडे अन काही फोटोवरून त्यांचे चारित्र्यहनन करत त्यांना बालिश ठरवण्याची थिल्लर स्वरूपाची टीका भाजपकडून सुरू करण्यात आलेली आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी म्हणाले की , ‘ सुरुवातीला ही पदयात्रा आम्हाला अवघड वाटत होती मात्र एक शक्ती आम्हाला यासाठी पुढे नेत आहे . आमची ही यात्रा भाजप तसेच विभाजन करणाऱ्या विचारधारेच्या विरोधात असून ही विचारधारा म्हणजे भारतावर झालेला हल्ला आहे. त्यांची देशभक्ती नाही तर देशाच्या विरोधातील काम ते करत आहेत.
आमच्या या प्रवास यात्रेत तुम्हाला कुठलाही द्वेष आणि हिंसा सापडणार नाही. अशी विचारसरणी केवळ यात्रेची नसून ही कर्नाटक आणि भारताच्या सर्व लोकांची विचारसरणी आहे. या लोकांनी चोवीस तास आणि आणखी पन्नास वर्षे जरी प्रयत्न केले तरी भारतीय नागरिकांच्या विचारसरणीतील हा डीएनए त्यांना काढून घेता येणार नाही.
सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळण्याचा सध्या विश्वास राहिलेला नाही.. भारतात गेल्या पंचेचाळीस वर्षात सर्वाधिक बेरोजगारी झालेली असून पंतप्रधानांनी दरवर्षी दोन कोटी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या नोकर्या कुठे गेल्या ? नोटाबंदी जीएसटी आणि कोरोना यातील पंतप्रधानांच्या चुकीच्या धोरणामुळे तब्बल साडेबारा कोटी लोकांचा रोजगार गेलेला आहे.