
गेल्या काही वर्षांपासून जमिनीचे भाव वाढलेले पाहायला मिळत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करत चक्क बनावट व्यक्ती उभे करून जमिनी लाटण्याचे प्रकार समोर येत आहेत..असाच एक प्रकार सोलापूर इथे समोर आलेला असून तीस ते पस्तीस वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या जागी तोतया व्यक्ती उभा करून बनावट सह्या केल्या आणि वाटपपत्र दस्ताची देखील बनावट नोंद करून घेतली. सदर प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , विजय तुकाराम खडतरे ( वय 54 राहणार लोकमान्य सोसायटी ब्लॉक नंबर आठ यांनी याप्रकरणी फिर्याद दिलेली असून रामचंद्र कदम हनुमंत तुकाराम कदम ,दत्तात्रय तुकाराम कदम आणि तोतया व्यक्ती असलेला श्रीराम तुकाराम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये या संदर्भात एक अर्ज प्राप्त झालेला होता. श्रीराम कदम हे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून बेपत्ता असून दस्तमधील साक्षीदार असलेले सतीश शंकर गवळी आणि यशवंत व्यंकट कदम यांनी परस्पर संगनमत करून शासनाची दिशाभूल केलेली आहे. वाटणी पत्र करून ठेवणाऱ्या व्यक्तीला ओळखणारे साक्षीदार सतीश गवळी आणि यशवंत कदम यांच्या विरोधात नोंदणी अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी सरकारच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोंढे करत आहेत.